कौतुक कुणाला नको असतं
कौतुक कुणाला नको असतं. अगदी लहान बाळापासून ते वयोवृद्ध आजी-आजोबांपर्यंत कुणालाही कौतुकाचे शब्द कानावर पडले की भारीच वाटतं, काहीतरी चांगलं केलंय, करतोय याची पावती मिळाल्यासारखं असतं ते.
पण कौतुकाची हल्ली एक गंमत झाली आहे. ती म्हणजे कौतुक करण्यापेक्षा स्पष्ट बोलण्याकडे जास्त भर दिला जातो आहे. खरं आणि स्पष्ट बोलण्याच्या नावाखाली आपण हे विसरायला लागलो आहोत की कायम (सतत) खरं आणि स्पष्ट बोलणं यातून फार काही समोरच्याचा फायदा होतो असं नाही. खरंतर जिथे दोन्हीचा balance दिसून येतो तिथे लोक जास्त proactive दिसून येतात. समोरची व्यक्ती जेव्हा मला पूर्णपणे समजून घेऊन माझ्या चुका किंवा कमतरता दाखवते तेव्हा त्यामध्ये बदल व्हायला हवा याची गरज माझ्याही मनात निर्माण होते, पण फक्त चुका दाखवल्या जात असतील, कमतरता दाखवल्या जात असतील तर नाही ऐकलं जाणार तुमचं. सध्या सगळ्यात प्रचलित वाक्य जे अनेकजणं गर्वाने वापरतात ते म्हणजे "I am brutally honest". त्यांना नक्की विचारावंसं वाटेल की honesty दाखवण्यासाठी brutal का व्हावं लागतं? You don't have to..! आणि मग ही honesty एखाद्याचं कौतुक करताना का नाही दाखवली जात? अर्थात याची दुसरी बाजू अशी पण आहे की जर कुणाला प्रत्येक वेळी आणि अगदी छोट्या गोष्टींसाठीसुद्धा कौतुकाची अपेक्षा असेल तरी त्याच्याही प्रगतीच्या दृष्टीने काही उपयोग असणार नाही. कौतुक कशाचं करायचं हा प्रश्न जर समोरच्याला पडत असेल तर, तो ते नाहीच करू शकणार.
कौतुक हवं असणं याचा सगळ्यात जवळचा संबंध आत्मस्वीकार आणि आत्मविश्वासाशी आहे. मी जर स्वतःला आहे तसं स्वीकारलं, माझ्या गुण-दोषांची जबादारी घेतली, त्यात वेळोवेळी गरजेनुसार योग्य ते बदल करत राहिलो, तर इतरांच्या बोलण्याचा किंवा मतांचा विचारच मला करायची गरज उरणार नाही आणि प्रामाणिकपणे मिळालेल्या मतांचा स्वीकारही माझ्याकडून केला जाईल. पण इतरांच्या मतांना अती महत्व जर दिलं जाणार असेल तर माझा आत्मविश्वास अजून कमी होत जाईल आणि इतरांकडून विनाकारण अपेक्षा केल्या जातील. परिणामी आपण कुठल्याच निर्णयाला पोचणार नाही. एखादा महत्वाचा decision घेण्याच्या प्रक्रियेतून जाताना याचा अनुभव अनेकांना आला असेलच.
त्यामुळे वेळप्रसंगी स्पष्ट असण्याबरोबर, गरजेनुसार आणि योग्य वेळी कौतुक करणं यालाही महत्व आहे. प्रत्येक बाबतीत केली गेलेली टिंगल, थट्टा याने समोरच्याचं खच्चीकरण होऊ शकतं याची जाणीव, तसेच आपण काहीही केलं तरी आपलं कौतुक झालंच पाहिजे, मला सगळ्यांनी भारी म्हटलंच पाहिजे या आपल्या demand ला कायम खतपाणी नाही मिळणार याची जगारूकता ठेवायला हवी. या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि म्हणूनच याचा विचार दोन्ही बाजूनी व्हायला हवा. मागणाऱ्याने काय मागायचं आणि देणाऱ्याने काय द्यायचं याचं भान ठेवणं खूप गरजेचं आहे.
Comments
Post a Comment